Monday 1 February 2016

निरोप..

कुणी कितीही नगण्य असो
प्रत्येकाला
कुणी न कुणी
कसले न कसले
निरोप पाठवत असतं
अव्याहत
कुणाकुणासाठी तरी

पाची संवेदनाच्या दारात
छुमछुमत असतात घुंगरू
संकेत देत असतात
निरोप आल्याचा

काल विचारलंस ना
कोणती कृती करू मी
की सार्थक होईल असण्याचं
जाता येईल काही मागं ठेवून..

फार काही नाही
फक्त वेचत राहा निरोप
दारात येऊन पडणारे
ताजे असतानाच
आणि पोचव ज्याचे त्याला
वेळेवर..

राहू देऊ नकोस एकही
वेचायचा... पोचवायचा...
मग जाताना
राहील मागे समाधान
की मी मला जगवणार्‍या
संवेदनांशी इमान राखलं..!

*** 

No comments:

Post a Comment