उद्गारांच्या
शहाण्या-सुरत्या..
वेड्या-वाकड्या..
श्लील-अश्लील
सर्व लेकरांना
शांत निजवून
रात्रीच्या गडद अंधारात
निवांत झोपायचं असतं
शब्दांना
पण तार्यांच्या लुकलुक
प्रकाशानं
हिंदकळत राहतो अंधार
शब्दांना झोपता येत नाही
स्वस्थ...!
ते उघडतात मग बंद स्वगतांची
दारं
दशदिशांत कोंदलेली
असंख्य रंग-रूपातली
असंख्य अस्फुटे
घुसतात दारातून आत..
आकाशातल्या गडद शांततेहून
अधिक कर्कश
भूगर्भातल्या लाव्ह्याहून
अधिक तप्त स्वरात
चित्कारतात ती
मोकळं करतात अंतरंग..
ज्वालामुखीत वितळून जातात
झाकापाक करणारे मुखवटे..
आतले निर्भय राहू पाहणारे
चेहरे
दीर्घ मोकळा श्वास घेतात..!
पण पुरती पहाट व्हायच्या
आतच
सुरू होते पक्षांची किलबिल,
कुहुकुहुची जुगलबंदी..
झोपू न शकलेल्या शब्दांना
जाग येते लगेच
तारवटलेल्या डोळ्यांनी
घाईघाईत ते शोधू लागतात
नवे मुखवटे..!
भू-गोलाच्या
परीघावरच्या
कोणत्याही नव्या दिवसाला
सामोरं जाता येत नाही
त्यांना
आपल्या अनावृत्त सत् रूपात..!
***
No comments:
Post a Comment